व्हॉट्सऍप कट्टा   

२४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागणारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा उपायुक्त वैभव विजय साबळे अखेर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला!
 
हा तोच वैभव साबळे आहे, ज्याने एमपीएससी परीक्षा कर्णबधीर असल्याचं खोटं प्रमाणपत्र लावून पास केली होती. गंमत म्हणजे, १९९३ साली ज्या दिवशी जन्म झाला, त्याच दिवशीच त्याला कर्णबधीर असल्याचं सर्टिफिकेट मिळालं! हे सगळं माहित असूनही यंत्रणेकडून काहीतरी कारवाई झाली का? नाही!
पूजा खेडकर प्रकरण उघड झाल्यानंतरच साबळेने शोभेच्या श्रवण यंत्राचा वापर सुरू केला - त्याआधी तो कधीही ते वापरत नव्हता. लोकांच्या तक्रारींच्या ढिगार्‍यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत!
आज ही गोष्ट पुन्हा सिद्ध झालीय - फसवून, खोटं बोलून, प्रमाणपत्र बनवून सेवेत आलेले लोक प्रामाणिक काम करू शकत नाहीत. ते फक्त खुर्चीचा गैरवापर करून, सामान्य जनतेचा छळ करून आणि लाच घेऊन आपल्या बोगस पात्रतेला लपवण्याचं काम करतात. सरळ शब्दांत सांगायचं झालं तर - सिस्टम आतून सडलीय. आणि ही सडलेली सिस्टमच आज कर्णबधीर नाही, तर संपूर्णतः मूक आणि अंध झालीय!
 
- विजय कुंभार, पुणे
---
लोकलचे नव्हे; मुंबईचे दार बंद करण्याची गरज 
 
मी नोकरीला लागताना मुलाखत द्यायला मुंबईत गेलो, पहिल्या प्रवासात चप्पल लोकलखाली पडली आणि मुंबईत नोकरी करायची नाही, असे त्याच क्षणी ठरवले..!!! मुंबईतील माणसे इतके भीषण आयुष्य जगताना इतकी आनंदी कशी असू शकतात... हे कोडे उलगडत नाही..
 
मुंबईत कामानिमित्त मी जातो. तेव्हा लोकलने प्रवास करण्याची वेळ येते. तेव्हा मुंबईकरांची अक्षरश: दया येते. आपल्याला एक-दोन दिवस तिथे त्या गर्दीत घुसणे कठीण होते, इथे ही माणसे रोज कसे जगत असतील...? ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी दिवसभर थकल्यावर उभे राहावे वाटत नाही... आम्ही ग्रामीण भागात जिथे नोकरी केली, तिथे १० मिनिटांत चहा प्यायला घरी जाता येते आणि इथे काम संपल्यावर पुन्हा दोन तास उभे राहण्याची शिक्षा... महिलांची वेदना तर तिथून पोहोचल्यावर पुन्हा स्वयंपाक आणि कामे....
 
माझी बहीण कल्याणला राहते. रात्रीच्या वेळी मी अनेकदा सीव्हीटी ते कल्याण प्रवास केला आहे आणि अगदी रात्री ११ वाजताही तितकीच भीषण चेंगराचेंगरी अनुभवली आहे... अनेकदा एका स्टेशनला उतरू दिले नाही म्हणून पुढच्या स्टेशनपर्यंत जाऊन मागे आलो आहे.. विरार लोकल थांबल्यावर अंगावर येणारी गर्दी बघून घाबरून गेलो आहे... लोकलच्या गर्दीत माणसे अतिशय हिंसक होतात.. चिडतात, संतापतात; पण मी त्यांचा राग समजून घेतो.. त्यातील अगतिकता समजून येते.. आमच्यासारखी कधीतरी जाणारी माणसे इतकी वैतागतात, तर रोज ही माणसे कशी जगतात... अक्षरश: एका पायावर उभ्याने प्रवास करताना अनेक माणसे मी बघितली तेव्हा अक्षरशः कालवाकालव होते..
 
पूर्वी किमान दुपारी १२ ते ५ पर्यंत तरी कमी गर्दी असायची; पण तेही सुख आता उरले नाहीत... पूर्णवेळ गर्दी असते...
अनेकजण रेल्वेवर आज तुटून पडत आहेत..; पण ही गर्दी फक्त लक्षण आहे हे लक्षात घेऊया.. दर सेकंदाला जरी लोकल सोडली तरीही ही गर्दी हटणार नाही.... हा खरा मुद्दा आहे...
 
त्यामुळे राज ठाकरे अनेक वर्षे जे बोलत आहेत. त्याच्याशी सहमत व्हावे लागेल.. कोणत्याही शहराची माणसे सामावून घेण्याची एक मर्यादा असते ती किती ताणायची? हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे लोकलला दारे लावण्यापेक्षा मुंबईला दार लावण्याची गरज आहे...
 
परप्रांतीय मुंबईत येऊ देणे थांबवायचे, की महाराष्ट्रातून येणारे लोंढे थांबवायचे ? याबद्दल वाद घालण्यात अर्थ नाही.. मुंबईत येणारी गर्दी थांबण्यासाठी काय भूमिका घेणार हा खरा मुद्दा आहे...
 
खेडी उद्ध्वस्त होत आहेत. शेती भकास झाली आहे. त्यामुळे उत्तर भारत असो, की महाराष्ट्र असो येथून येणारे लोंढे का येतात यावर खरी चर्चा व्हायला हवी... केवळ मुंबईच नाही, तर सगळीच शहरे आज तशीच झाली आहेत.. दिल्ली, बंगळुरूसारखी शहरे असो, की पुणे असो या सगळ्या शहरात चालणे मुश्किल झाले आहे... त्यावर उपाय म्हणून मेट्रो आणल्या जातात, रस्ते, पूल सी लिंक असे महागडे उपाय केले जातात...; पण हा खरेच मार्ग आहे का? ही शहरे इतकी का सुजली आहेत? सातत्याने माणसे या शहरांकडे का धावत आहेत? यावर विचार करणार आहोत की नाही?
 
महाराष्ट्राचे नागरीकरण आज ५० टक्क्यापेक्षा जास्त झाले आहे. १९७१ मध्ये जितकी महाराष्ट्राची लोकसंख्या होती, तितकी लोकसंख्या २०१५ मध्ये महाराष्ट्रातील फक्त शहरात राहतात इतके हे प्रमाण वाढले आहे... त्यामुळे लोंढे फक्त उत्तर भारतातून येत नाहीत, महाराष्ट्राच्या खेड्यातून येतात हेही लक्षात यायला हवे...
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हा मुद्दा नेहमी मांडायचे... शेतीचे प्रश्न सुटत नाही म्हणून आज शहरात लोंढे जात आहेत. त्यामुळे मुख्य मुद्दा मुंबईतल्या गर्दीचे व्यवस्थापन हा नाहीच, तर त्याचे उत्तर दूर खेड्यात असलेल्या शेतीत आहे.. उत्तर भारतात ग्रामीण रोजगार निर्मिती व औद्योगिकीकरणात आहे.. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती हेच उत्तर आहे. गर्दी आज सर्वच शहरात दिसते आहे. सगळीच जिल्ह्याची गावे आज त्याच रस्त्याने निघालीत.. तालुक्याच्या गावांना आज बायपास काढावे लागत आहेत... त्यामुळे जास्त बजेट आज शहरातील व्यवस्थापन यावर खर्च करावे लागते आहे. खरा मुद्दा हा खेड्यातील विकासावर खर्च करण्याचा आहे, तर आणि तरच ही गर्दी थांबू शकेल... तेव्हा वरवर मलमपट्टी करण्यापेक्षा मुंबई रिकामी करण्याचे मार्ग कोणते यावर चर्चा व्हायला हवी.
 
त्यामुळे खरा मुद्दा रेल्वे प्रशासन सुधारणा हा नाही तर मुंबईत आज येणारी गर्दी कशी रोखायची? हाच खरा मुद्दा आहे. या मुद्द्याला मराठी, की परप्रांतीय असे स्वरूप न देता मुंबईचे दार बंद करण्याचा आहे.....
 
मला संकुचित म्हटले तरी चालेल; पण शहरातील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलणे हाच खरा मुद्दा आहे.
लोकलचे दार बंद करायचे, की नाही यावर वाद घालण्यापेक्षा मुंबईचे दार कसे बंद करायचे यावर चर्चा व्हायला हवी..
 
- हेरंब कुलकर्णी,
मो : ८२०८५८९१९५

Related Articles